' उन्मेष ' म्हणजे दर्जा, सातत्य आणि प्रयोगशीलता...

आमच्याबद्दल

उन्मेष प्रकाशन

‘उन्मेष’ प्रकाशनबद्दल सांगायचं तर साहित्यातल्या नवनवीन जाणीवांना, नवलेखकांना आणि निर्मितीतल्या प्रयोगशीलतेलाही आपलंसं करणारी, दर्जा आणि सातत्य याचं भान ठेवणारी ‘आजची’ प्रकाशनसंस्था म्हणता येईल.

पत्रकारितेची पदवी घेतल्यानंतर संपादनाचे धडे ‘माणूस’ साप्ताहिकामध्ये मनापासून अभ्यासता आले. लेखन, संपादन, मुद्रित शोधन, छपाई, बांधणी या साहित्यनिर्मितीशी संबंधित सगळ्याच घटकांची जवळून ओळख झाली आणि यातूनच पुस्तक निर्मितीच्या या उद्योगाला सुरुवात झाली.

१९८७ साली सुरू झालेली ‘उन्मेष’ ची वाटचाल कायम आनंददायक आणि आशावाद जागवणारीच वाटली.

उन्मेष प्रकाशनच्या प्रकाशित पुस्तकांचा आकडा आता सातशेच्यावर गेला आहे आणि एकूण तेवीस साहित्य प्रकारांमध्ये दर्जेदार पुस्तकांची निर्मिती केली आहे.
पुस्तक निर्मिती ही मला नेहमीच सृजनशील, आव्हानात्मक आणि संपादकीय प्रयोगशीलतेला आणि नाविन्याला वाव देणारी वाटली. नवीन विषय, नवीन लेखक यांना उन्मेषने कायमच महत्त्व दिलं. साहित्याच्या रूढ कल्पना महत्त्वाच्या आहेतच; पण त्याबरोबर माहितीपर साहित्य ललित गद्य रूपात मांडणारे कितीतरी विषय उन्मेष प्रकाशनाने सुरू केले. पालक, उपक्रमशील शिक्षक, आधुनिक स्त्रिया, कुमारवयीन वाचक यांच्यासाठीही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. पुस्तकाची किंमत वाचकांना परवडणारी असल्यामुळे विक्रेते आणि वाचक यांनी विशेष जाहिरात न करताही पुस्तकांना उत्तम प्रतिसाद दिला. लेखक, वितरक आणि वाचक यांच्या प्रतिसाद आणि सहकार्यामुळेच कोणतीही मरगळ न येता पुस्तक निर्मितीचा हा व्यवसाय उत्साहाने चालू आहे. अक्षरजुळणी, छपाई, बाइंडिंग या तंत्रांमध्ये काळानुसार चांगले बदल झाले आहेत. ऑनलाईन विक्री यंत्रणा हा आता काळाचा भाग झाला आहे. सर्व महत्त्वाच्या ऑनलाईन माध्यमांतून, वितरकांकडून पुस्तक विक्रीसाठी सहकार्य मिळतेच आहे. या वर्षात डिजिटल माध्यमाचा जास्तीत जास्त उपयोग करून वाचकांपर्यंत आणि वितरकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायचा आहे.

उन्मेषसाठी ज्या लेखकांना लेखन सहकार्य देण्याची इच्छा आहे त्यांचे निश्चित स्वागत आहे. तसेच नवीन वाचक आणि वितरकांनीही ‘उन्मेष’ च्या पुस्तकांशी नाते निर्माण करून दृढ करावे ही विनंती.

स्नेहांकित
मेधा राजहंस
प्रकाशक

पुस्तक निर्मितीतील अविभाज्य भाग -मुद्रित शोधन

पुस्तक निर्मितीतला अत्यंत महत्वाचा, संपादना नंतरचा भाग म्हणजे प्रुफ रिडींग – मुद्रित शोधन. प्रुफ रिडिंगची सवय – सहाय्यक संपादक आणि ‘नव उन्मेष’ दिवाळी अंकाची संपादक म्हणून काम करताना मला होतीच. भाषाशुद्धी, छापील मजकूर बिनचुक आणि निर्दोष असायला पाहिजे हे मराठी भाषेवरच्या प्रेमामुळे मलाही कायमच अतिशय महत्वाचं वाटलं. प्रूफरीडींगची जबाबदारी प्रकाशक म्हणून आज जास्तच महत्वाची झाली आहे. चांगल्या मुद्रित शोधकांची आज प्रकाशन व्यवसायात खूप गरज आहे. मराठी भाषेला आता तर अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे चांगले मराठी लिहिणारे, वाचणारे, छापणारे हेच काळाच्या ओघात मराठीचं अभिजातपण टिकवू शकतील.

संपादनकला महत्वाची...

पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर सहाय्यक संपादक म्हणून ‘माणूस’ साप्ताहिकामधे काम करत असताना संपादक श्री. ग. माजगावकर यांचं अतिशय, अमूल्य मार्गदर्शन मला मिळालं. संपादन या महत्वाच्या निर्मितीक्षम घटकाचं संपूर्ण पुस्तकनिर्मितीत किती महत्वाचं स्थान असतं ते त्यांच्याबरोबर काम करताना आत्मसात करता आलं. लेखकामधलं ‘लेखकपण’ ओळखणं, त्याला त्या विषयाच्या सर्व कोनांचा अभ्यास करायला उद्युक्त करणं आणि त्याच्या शैलीत लिहितं करणं ही संपादन कला आहे. ‘उन्मेष’ ची बहुसंख्य पुस्तकं या संपादक-लेखक संवादातूनच पूर्णत्वाला गेली आहेत. वाचकांच्या ‘जगण्यामधे’ भर घालणारी पुस्तकं तयार करणं हे ‘उन्मेष’ चं ध्येय होतं असे म्हणता येईल. जगण्याचे अनेकविध पैलू असतात, आणि माणसागणिक ते बदलतात. सर्वसामान्यपणे सर्वांना महत्वाचे वाटतील असे विषय पुस्तकासाठी निवडणं असं धोरण होतं. एकच नियम निश्चित होता तो म्हणजे अंधश्रद्धा वाढविणारं साहित्य आणि सवंग साहित्य कधी प्रकाशित करायचं नाही. विषयाचा दर्जा नेहमीच महत्वाचा राहिला.

वितरक आणि वितरण व्यवस्था

प्रकाशक झाल्यावर पुस्तकांचे महत्वाचे वितरक माहीत झाले. तेव्हा आयडियल बुक डेपोचे कांताशेठ नेरूरकर, बॉम्बे बुक डेपोचे कुमठाशेट, मॅजेस्टिक बुक स्टॉलचे कोठावळे बंधू, रसिक साहित्य, विद्या एजन्सीज या मोठ्या वितरण संस्थांशी व्यवहार सुरू झाले. त्यानंतर महत्वाच्या मोठ्या शहरांमध्येही वितरक कोण आहेत ते हळूहळू समजत गेलं. साहित्य प्रसार केंद्र – नागपूर, बजाज बुक डेपो- अमरावती, मेहता बुक सेलर्स – कोल्हापूर, ज्योति बुक स्टोअर्स- नाशिक असे आणखी कितीतरी सांगता येईल. आज वितरणामधे ऑनलाईन विक्रीसाठी बुकगंगा, अमेझॉन, अक्षरधारा, रसिक, मेनका, हे महत्वाचे विक्रेते असल्यामुळे जगभरातल्या पुस्तक-ग्राहकांपर्यंत पोचणे खूप सोपे झाले आहे.